Friday, May 13, 2011

भांडण


परवा गाडीत पेट्रोल टाकायला साधारण नऊच्या सुमारास पेट्रोल पम्पवर गेलो.पुणेकर जितक्या सभ्यपणे रांगा लावून उभे राहू शकतात तितक्या सभ्यपणे उभे होते.मी पैसे काढत होतो तेवढ्यात मागून खाडकन आवाज आला.त्यापाठोपाठ २ ३ छप्पर तोड शिव्या.मागे वळून बघितला तर एक बाई साधारण पणे ३५ ते ४० वय,निम्न मध्यमवर्गीय घरातली,पम्पावरच्या एका कर्मचाऱ्याला चपलेने थोबाडत होती.त्याने कमी पेट्रोल भरले आणि जाब विचारल्यावर उद्दाम पणे उत्तर दिले म्हणून.जवळच तिचा नवरा उभा होता आणि अर्वाच्य अश्या शिव्या घालून बायकोचा उत्साह वाढवत होता.तो कर्मचारी सुद्धा तेवढ्याच हिरारीने त्याच्याकडचा शिव्यांचा stock बाहेर काढत होता.सगळा पंप त्यांच्याकडे टकामका बघत उभा.थोड्यावेळात त्यांच्याच लक्षात आले कि त्यांचे भांडण हे जनतेसाठी फुकटची करमणूक होतेय मग मात्र त्यांनी आटोपत घेतलं आणि नवरा बायको मार्गस्थ झाले.घरापर्यंत च्या रस्त्याभर माझ्यामनात मात्र एकच प्रश्न येत होता,रस्त्यात त्या नवरा बायकोचा संवाद काय असणार?”वा काय थोबाडलास त्या माणसाला”,”मग,ऐकून घेतेय का मी त्या मुडद्याच? बाकी तुम्ही पण मस्त शिव्या घातल्या हो त्याला”. आणि तो माणूस घरी जाऊन काय सांगणार?”आज मी माझ्या असभ्य बोलण्यामुळे एका बाई च्या हातून मार खाल्ला?”
मला नेहमी हा प्रश्न पडतो कि लोकांना भांडण्याची एवढी खुमखुमी येते कशी?शाब्दिक वाद एकवेळ समजू शकतो,पण चार चौघात सरळ एखाद्याला थोबडणे म्हणजे अतिशय हिंमतीचे काम आहे.आम्हाला समोरच्याची चूक असताना पण ते त्याच्या तोंडावर सांगायची हिम्मत होत नाही.असंच परवा मी एका दुकानात recharge करायला गेलेलो असताना दुकानदाराने MRP वर एक रुपया जास्त मागितला,का विचारल्यावर हे असचं आहे घ्यायचयं तर घ्या असं typical पुणेरी उत्तर.मी आपला मनातल्या मनात त्याला ४ सणसणीत शिव्या हासडल्या आणि इथे परत यायचे नाही ही मनाशी खूणगाठ बांधून निमुटपणे त्याला एका रुपयाने श्रीमंत केले.
माझ्यासारखी पापभीरू धर्मभीरू(खरतर भित्री) माणसं जास्तीत जास्ती एवढचं करू शकतात.रस्त्यावरची घाण असह्य झाली की सरळ रस्ताच बदलायचा(जास्तीत जास्त संध्याकाळी कट्ट्यावर सरकारला चार शिव्या घालायच्या की झालं) बरं असही नाही की आमच्या आयुष्यात कोणी असं येत नाही ज्याला एक सणसणीत हाणावी असं वाटावं.भ्रष्ट राजकारणी,लुटणारे दुकानदार,आपण शिस्तीत सिग्नल वर थांबलेलो असताना सुसाट वेगात सिग्नल तोडून जाणारा bike वाला एक न दोन दिवसातून एखाद्या तरी अश्या माणसाशी गाठ पडतेच.मग आपणच स्व:ताची समजूत काढायची,आपण समाजाच्या चौकटीत राहतो,चारचौघात भांडणं हे सभ्य माणसाला शोभून दिसत नाही,आपण कशाला त्याच्या पातळीवर उतरायचं?त्याला नसली तरी आपल्याला काही dignity आहे.पण खरंतर आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाने स्वताच्या हक्कासाठी चारचौघात भांडणे हे अतिशय दुर्मिळ दृश्य आहे,(हं आता तुम्ही पुणेकर असाल तर गोष्टच वेगळी) पेट्रोल पंप वर पैसे जास्त घेऊन पेट्रोल कमी टाकले,जाऊदेत आता म्हणल्यावर तर टाकतोय न तो पूर्ण.ऑटो वाला उद्दाम पणे बोलला,जाऊदेत आपण कुठे मनाला लावून घेतोय.
पण असं काहीतरी बघितल्यावर मात्र वाटतं सालं आपण असतो तर काय केला असतं,निमूटपणे २ वाक्य बोलून बाहेर पडलो असतो,म्हणजे तो पंप वाला दुसऱ्याला गन्डवायला मोकळा.मग मात्र उद्विग्नता येते. वाटत साला सगळ समाज,सभ्यता गेली खड्यात.समाज,सामाजिक बंधनं ही काय फक्त आपल्यासाठीच आहेत?समोरच्याने कसंही वागायचं,सगळे नियम मोडायचे आणि तरी ताठ मानेने फिरायचं आणि आपण मात्र स्वःताला नियमांच्या चाकोरीत बांधूनही नेहमी मान खाली घालायची.अहिंसा सुद्धा त्यालाच शोभते जो हिंसा करण्यास समर्थ असतो.कधीतरी जशास तसचं वागावं लागतं.मनात ठरवतो आता यापुढे आपली चूक नसताना बिलकुल मान खाली घालायची नाही.समोरच्याला चांगला खडसावायचा,अगदी जशास तसं उत्तर द्यायचं.आणि दुसऱ्याच क्षणी समोरून wrongside ने एक bike वाला भन्नाट speed ने येऊन कट मारून रागाने बघत जातो जणू माझीच चूक आहे.मी निमुटपणे मान खाली घालतो,तोंडातल्या तोंडात sorry पुटपुटतो आणि घरच्या दिशेने निघतो.