Tuesday, June 19, 2012

मैत्र


“राघव जेवण टेबलावर ठेवलंय. बाई येतील १२ ला तेव्हा वाढून देतील. काही लागलं तर फोन कर मला. गेम्स खेळत बसू नकोस दिवस भर. आधीच या accident मुळे बराच अभ्यास बुडलाय आपला. आणि बाथरूम ला जाताना cruches घेऊन जा,उगाच पराक्रम करू नकोस काही. मुग्धा आली अभ्यासाला तर भांडत बसू  नकोस तिच्याशी.”

“हो ,हो,हो आई.रोज काय आपले तेच तेच instructions? १२ वीत गेलोय ना आता,एवढं कळतं मला.”

“हो रे बाबा,काळजी वाटते एवढंच. चल निघते मी ऑफिस ला. राहशील ना नीट?”

“हो गं आई. जा तू. किल्ली घे आणि आठवणीने.”
                                    ११ वी ची परीक्षा संपली आणि दुसऱ्या दिवशी मित्राच्या Activa वरून भर गुडलक चौकात राघव पडला. डावा पाय दोन महिने प्लास्टर मध्ये. आत्ता कुठे १५ दिवस झाले होते आणि राघव एवढ्यातच जाम कंटाळला होता. आधीच engineering entrance ची तयारी, त्यात क्लासेस बुडल्याचं टेंशन. नाही म्हणायला मुग्धा रोज दुपारी यायची. पण तिलाही अभ्यासच सुचायचा नुसता.
                                    दुपारी जेवून राघव TV बघत बसला होता, तेवढयात बेल वाजली. कोण आहे विचारे पर्यंत मुग्धा latch उघडून आत आली होती.

‘धा,तुला किल्ली काय उगाच दिली आहे का आई ने? बेल का वाजवतेस कारण नसताना?’ राघव चा मूड आज उखडलेलाचं होता.

‘अरे म्हणलं एकदम धडकायचं कसं. Manners नको का काही?’

‘माझ्या घरी कधीपासून Manners लागू लागले तुला?’

‘बरं. नाही वाजवणार उद्यापासून. काय चाललंय? आणि TV?? राघव,अभ्यास कोण करणार?’

‘तू. आणि प्लीज एवढी ओवर होऊ देत.’

‘नाही!! फिजिक्स मध्ये मागे पडतोय आपण. कळतंय ना? अजून projectile सुरु पण केलं नाहीये.’

‘हो गं. माहितीये. तू तुझं बायो कर त्यापेक्षा. माझी match संपे पर्यंत.’

‘मी केलंय ते सकाळीच. सकाळपासून किती अभ्यास झालंय तुझा?’

‘धा,तू माझी teacher नाहीएस.’ राघव चं सगळं लक्ष TV कडे होतं.

‘काल ४ तास झाला होता फक्त.’

‘१२ वी साठी पुरेसा आहे तेवढा सध्या.’

‘मग JEE चा फॉर्म भरूच नकोस ना.’

‘पुरे झालं. तुला काय करायचंय? मी भरीन नाहीतर नाही. आल्यापासून बघतोय,साधं कसा आहेस,एवढ पण विचारलं नाहीएस तू मला. नुसतं Bossing करतेस. जीव नकोसा झालाय घरात बसून नुसता. रोज संध्याकाळी ग्राउंड वर मित्र football खेळताना दिसले की डोकच उठतं. वरून तुला साधी दोन वाक्य नीट बोलता येत नाही का गं?’

‘तू तुझ्याच चुकीमुळे पडला आहेस राघव,थोडं तर सहन करावंच लागणार ना.’

‘आता मात्र कमाल झाली! अगं पेशंट शी असं बोलतं का कोणी? एवढं लागलंय. दुखतंय केवढं.’ मुग्धा जोरजोरात हसू लागली. राघव चा त्रागा अजूनच वाढला.

‘हसतेस काय मूर्खासारखी? मी सांगून ठेवतोय,मी मारीन हं  धा तुला आता.’

‘हसू नको तर काय? पेशंट म्हणे. वागा आधी पेशंट सारखं. आणि १५ दिवस झालेत प्लास्टर लागून. अजून दीड महिना काढायचाय. किती कौतुक करणार त्याचं?’
राघव ने रागात रिमोट फेकून मारला. मुग्धा ने तो सहज चुकवला.

‘जा.तुझा तो कॉलेज crush, काय नाव त्याचं? हं अनिरुद्ध. तो पडला आणि पाय तुटला त्याचा की कळेल तुला.’

‘ते मी बघीन माझं..पुस्तक उघडा फिजिक्स चं आपलं.’

‘I HATE YOU मुग्धा. तू आत बस रूम मधे अभ्यासाला. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. I can study on my own.’ राघव रागात ओरडला.

‘जातेय. मलाही तुझ्याबरोबर अभ्यास करायचा नाहीए. अभ्यास कमी आणि timepass जास्त.’ मुग्धा आत जाता जाता बोलली.

‘आणि माझ्याशी बोलायची काही एक गरज नाहीये. गप अभ्यास कर नाहीतर घरी जा सरळ.’

‘काकूंनी सांगितलंय म्हणून येते मी इथे अभ्यासाला.तुझ्यासाठी नाही.’
-----------------------------
४ वाजले होते. दोघही एकमेकांशी नं बोलता अभ्यास करत बसली होती. राघव मनातल्या मनात रागाने धुमसत होता. बास. उद्यापासून मुग्धा ला सांगून टाकायचं,तू इथे यायची गरज नाहीये. मी बघीन माझं. आणि आता अभ्यास एके अभ्यास. कोणीही येऊन आपल्याला अभ्यासावरून बोलून जावं याला काय अर्थ आहे? हिचं काय कौतुक? काय समजते स्वतःला कोणास ठाऊक? १२ वी ला आता हिच्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीत जास्त मार्क्स पडलेच पाहिजेत. त्याने ठरवून टाकलं होतं. तेवढयात आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. नकळत त्याच्या इच्छेविरुद्ध राघव ओरडला.

‘धा,हजारदा सांगितलंय माझ्या गोष्टींना हात लावू नकोस म्हणून.’
तोपर्यंत मुग्धा हातात दोन तीन बॉक्सेस घेऊन बाहेर आली होती.

‘हे काय आहे आता?’

‘चेस,लुडो,सापशिडी,पत्ते. सांगा काय खेळणार आपण?’

‘मी तुझ्याशी बोलत नाहीए.’

‘ते दिसतंच आहे.’

‘मला काही खेळायचं नाहीये.’

‘ते ही वाटलंच होतं मला. लहानपणी सारखं हरणार परत. म्हणून घाबरून नाही म्हणतो आहेस तू.’

‘आवरा. किती खोट! तूच हरायचीसं आणि रडायचीसं.’

‘हो? मग एकदा पत्त्यांमध्ये हरल्यावर माझ्या बाबांकडे रडत रडत कोण गेलं होतं तक्रार घेऊन?’

‘तू पत्ता लपवलेला मुद्दाम. आणि मी परत एकदा सांगतोय मी रडत नव्हतो. सायनस मुळे डोळ्यात पाणी यायचं सारखं तेव्हा.’

‘बरं. राहिलं.’

‘राहिलं काय? आत्ता वाट पत्ते. लगेच कळेल कोण रडतं नेहमी ते.’ 
जणू त्याने हो म्हणायची वाट बघत असल्यासारखी ती लगेच पत्ते पिसायला लागली. राघव च्या चेहऱ्यावर नकळत स्मितहास्य फुलत होतं.

त्या भांडणातलं मैत्र फक्त त्या दोघांनाच दिसत होतं.

Tuesday, January 3, 2012

Common Man


३१ डिसेंबर गेला. १ जानेवारी चा रविवार सुध्दा निष्क्रियतेत घालवला. T.V. वर बघण्यासारखं होतं ते सगळं बघून काढलं. २ जानेवारी चा सोमवार उगवल्यावर मात्र तो नाईलाजाने उठून office ला जायला तयार झाला. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या,जल्लोष,दारू सगळंच संपलं होतं म्हणाना. कपडे घालत असताना त्याच्या मनात परवा office मध्ये घडलेलं संभाषण आठवत होतं. जोशी म्हणत होता checks चे shirt आता old fashion झालेत. बदल म्हणून. नवीन वर्षाच्या निमित्ताने जुने shirts तरी बदलले पाहिजेत. जुनं ते सोनं म्हणायचा एक काळ होता. आता नवीनच म्हणी आल्या आहेत.जुनं ते टाकाऊ हेच रूढ झालंय. तेवढयात बाहेरून आवाज आला. ‘अहो निघताय ना? डबा तयार आहे. लोकल सुटली तर taxi ने जावं लागेल.नव्या वर्षी पहिल्याच दिवशी भुर्दंड.
लोकल रोजच सुटत होती.अगदी ९.३२ शार्प.आजही सुटेलचं. त्यावेळात आपण स्टेशन वर पोहोचलो म्हणजे जिंकली. असे लहान लहान विजय त्याच्या आयुष्यात खूप महत्वाचे होते. लोकल वेळेवर पकडणं,ऑफिस मध्ये बॉस चं firing चुकवणं,झोपडपट्टी च्या गणपती ची वर्गणी न देऊन ही सुखरूप असणं. अजून असे कितीतरी. जणू या विजयांवर चं त्याचं आयुष्य चालू होतं.
गाडीत बसल्या बसल्या तो विचार करत होता,एक संपूर्ण वर्ष गेलं. ३६५ दिवस. प्रत्येक दिवसाचे २४ तास. आता २४ गुणिले ३६५ म्हणजे कितीतरी हजार तास. तसं त्याचं गणित शाळेपासूनच कच्चं होतं. त्यात मिनिटांची तर गणतीच नाही. इथे अगदी एक मिनिट जरी लेट झालं तरी लोकल सुटायची. ह्या प्रत्येक दिवसात, तासात, मिनिटात सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर कित्येक घटना घडल्या. आपण त्याचा कितपत आढावा घेतला? त्या घटनांचा आपल्या आयुष्यावर काय फरक पडला? तो विचार करत होता. असं विचार केल्याने त्याचं त्यालाच बरं वाटायचं. काही क्षण का होईना आपण मोठे विचारवंत आहोत हा भाव मनात येऊन जायचा. परत घरी बायकोला आणि ऑफिस मध्ये जोश्या ला सद्य परिस्थितीबद्दल ४ विचार ऐकवता यायचे ते वेगळेच. तेवढचं आपलं वर्चस्व दाखवल्यासारखं. या विचार प्रक्रियेला त्याने चिंतन असं भारदस्त नाव दिलं होतं.
तर हे वर्ष विविध घडामोडींचं राहिलं निश्चितच. पण म्हणून त्याने त्याच्या आयुष्याला काय कलाटणी मिळाली? ट्युनिशिया इजिप्त लिबिया मध्ये सत्तांतर झाले. लोकशाही चा दणदणीत विजय. किती सुंदर नाव दिलं त्या क्रांती ला लोकांनी. जास्मीन क्रांती. पण त्या क्रांती ने घडवलं काय? पेट्रोल डीजल महागले. परिणामतः रोजच्या वापरातल्या सगळ्याच वस्तू महागल्या. महिन्याचा पगार परत एकदा पुरेनासा झाला. एवढं सगळं होऊनही त्या देशांमध्ये स्थैर्य आलं,तिथल्या लोकांचं राहणीमान सुधारलं तर तसंही नाही. मग घडलं काय?
विचार करता करता त्याने नकळत त्याचा गोल चष्मा काढून हातात घेतला.एकेकाळी गांधींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन घातलेली ती गोल फ्रेम. २०१२ मध्ये तशी out of fashion चं आहे. जाऊदे. जिथे स्वतः गांधी old fashion झाले तिथे त्यांची फ्रेम कुठे घेऊन बसता. सध्या काळचं प्रतीगांधींचा आहे. काय करणार? त्याने मनात आलेले हे विचार झटकून टाकले आणि विचारांची गाडी परत रुळावर आणली.
वर्षभर भ्रष्टाचार भारतात news channels वरचा मुख्य मुद्दा होता. आधी commonwealth मग आदर्श मग 2G चं तर काही विचारायलाच नको. अण्णांनी लोकपाल मागितला. उपोषणं केली. मीडिया गाजवली. त्याला मात्र शेवटपर्यंत कळलं नाही की लोकपाल आल्याने एकाएकी भाज्यांचे भाव कमी होणार? का त्याचा पगार महिन्याला पुरायला लागणार? आणि जर दोन्ही होणार नसेल तर त्या लोकपालचा त्याच्या सारख्याला उपयोग तरी काय? या प्रश्नाचं उत्तर त्याला कुठलंच TV channel देत नव्हतं. बहुदा याचं उत्तर अण्णांकडे पण नसावं. त्याला स्वतःच्याच विचारांचं हसू आलं. पण मग त्याने लगेच स्वतःला आवर घातला. चिंतन करत असताना हसणं हे निव्वळ उथळपणाचं लक्षण होतं.
चिंतन करता करता त्याचं स्टेशन कधी आलं त्यालाचं कळलं नाही. स्वतःच्याच विचारात तो सवयीने स्टेशन वर उतरून गर्दीत मिसळला. कित्येक वर्ष रोजचं तो या अश्या गर्दीत मिसळत होता. गर्दी वाढतचं होती. त्याची निरीक्षण शक्ती मात्र अजूनही तेवढीच तीव्र होती. खरतरं गेली किती वर्ष हेच चालू होतं. महागाई वाढत होती,भ्रष्टाचार चालूच होतं,पगार कधीच पुरत नव्हता. आयुष्यात तोचतोच पणा आला होता. काही किरकोळ बदल घडू लागले होत नाही असं नाही. धोतर जाऊन ‍‌पँट आली. आता पुढे कधीतरी बहुदा चेक्स चा शर्ट ही जाईल. गांधींची आदर्श फ्रेम ही न जाणो अमिताभ च्या fashionable फ्रेम ने बदलल्या जाईल. ते टक्कल मात्र तसचं असेल,ते जाणं शक्य नाहीच. नवीन वर्षात हा आवरणाचा एवढा बदल तरी हवाच. कारण कितीही प्रयत्न केला तरी त्या आवरणातला माणूस हा नेहमी सामान्यचं राहणार आहे.
परवा मी सहज मित्राबरोबर कट्ट्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत उभा होतो. तेवढयात तो दिसला. बाजूलाच बसला होता. आमचं बोलणं शांतपणे ऐकत. मला वाटलं आता तो सुद्धा काहीतरी बोलेल,त्याचं मत मांडेल. पण तो काहीच बोलला नाही. मग लक्षात आलं. इतक्या वर्षात त्याला बोलताना बघितलंय कोणी? तो तर जन्मभर नुसता बघत,ऐकत आलायं. मग मीच आपला बोलत राहिलो. थोड्यावेळाने तो उठून निघून गेला. बहुदा दुसऱ्या कुणाचं तरी ऐकायला.