Saturday, October 5, 2013

काही गोष्टी सुटलेल्या..

जेव्हा पासून हे ठरलं कि मी जर्मनी ला शिकायला जाणार, तेव्हापासून मनात होतं काहीतरी लिहायचं. पण जाण्यातही एवढे सतराशे साठ विघ्न आले कि लिहिणं तर दूर, आपण जाणार तरी आहोत कि नाही याचीच शंका यायला लागली. मी जायच्या एक दोन दिवस आधी एक मैत्रीण म्हणाली सुद्धा, आता या सगळ्या प्रोसेस वर एक ब्लॉग पोस्ट लिही. मनात म्हणलं लिहायचं तर आहेच, पण काय हे काही माहित नाही.

विचार करायलाही वेळ मिळाला नाही एवढ्या गडबडीत भारतातले शेवटचे काही दिवस गेले. जाण्याची गडबड, मित्रमैत्रिणीना भेटणं, विसा चे रोज उद्भवणारे नवीन प्रॉब्लेम्स, शॉपिंग, त्यात स्वतःवर ओढवून घेतलेला नाटकाचा झांगडगुत्ता, शेवटचे काही दिवस तर मी काय करतोय मलाच कळत नव्हतं. भेटणारी प्रत्येक व्यक्ती विचारायची कसं वाटतंय, आता किमान दोन वर्ष भारताबाहेर, परत येशील तेव्हाही सगळं बदलेलं असेल. मी म्हणायचो काही वाटण्याएवढा seriousness अजून आलाच नाहीये. तेव्हा या सगळ्या भावना Register च नव्हत्या झाल्या. डोक्यात वेगळीच चक्रं सुरु असायची.

इथे आल्यावर मात्र हळू हळू जसं नव्याच नवेपण उतरू लागलं तसं एक एक गोष्ट जाणवू लागली. यापुढे दोन वर्षं तरी किमान काय काय करता येणार नाही याची लिस्ट मनात हळू हळू तयार होऊ लागली, आणि मन उदासवाणं होऊ लागलं. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांना भेटणं नाही. WhatsApp वगैरे किती भंपक गोष्टी आहेत याची पहिल्यांदाच जाणीव झाली. तुम्ही कितीवेळ तुमच्या भावना टक टक करत type करत बसणार.

दुसरं म्हणजे पुणे. यापुढे कधीही उठलो गाडी काढली आणि निघालो असं करता येणार नाही. खिशात नेहमी map ठेवा, ट्राम, ट्रेन्स चे time table पाठ करा, एक बस सुटली कि झालं, मग धावत धावत जवळचे रेल्वे स्टेशन गाठणे. निरंजन नाही, गुडलक नाही, वैशाली नाही, maggi point नाही, निरुद्द्देश्य गाडीवर फिरणे नाही, कॉलेज समोर चा अण्णा नाही, रात्री ३ ला कमसम ला जाणे नाही, गणपती मध्ये ढोलांचा घुमणारा नाद नाही, गणपतीची मिरवणूक नाही, दिवाळीची सारसबाग नाही, पुरुषोत्तम नाही, फिरोदिया नाही, कॉलेज च्या नावाने ओरडणे नाही, थोडक्यात काहीच नाही.

कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या. काय होतंय, आहे अजून वेळ, आपण कुठे चाललोय, करू निवांत असं करता करता मी कधी निघून गेलो कळलंच नाही. एकदा जबलपूर ला नवरात्रात जायचं होतं. ५ वर्ष कॉलेज, कामाच्या निम्मिताने जाणे झालेच नाही. आता कधी होईल काय माहित. ग्वारीघाट ला जायचं होतं, नाही झालं. कित्येक पुस्तकांची लिस्ट काढून ठेवली होती वाचण्यासाठी, नाटकं, सिनेमे बघायचे होते, राहून गेले. अश्या असंख्य गोष्टी. कितीदा जाऊदे म्हणून सोडून द्यायचं.

हे सगळं कोणाला सांगू लागलो कि प्रत्येक जण म्हणतो एवढं होतं तर मग गेलाच कशाला? इथे जगत नाहीत का लोकं? करायचं इथेच काहीतरी. ते ही खरंच आहे म्हणा. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्ही एकतर ठाम राहू शकता, किंवा त्याबद्दल जन्मभर रडू शकता. पण एखाद्या गोष्टीवर ठाम राहायचं म्हणजे हातातून सुटत चाललेल्या गोष्टींबद्दल काहीच वाटू द्यायचं नाही का? का वाटत असलं तरी बोलायचं नाही, व्यक्त व्हायचं नाही?

असंच एक दोन दिवासंपूर्वी नेट वर फिरत असताना काही खूप सुंदर ओळी सापडल्या -

शहर बदलते ही ज़िन्दगी जीना सीख लिया उस समझदार ने,
और एक हम है की बेवकुफो की तरह मुल्क बदलते रहे जिन्दा रहने के लिए.

काहीतरी मनातलं, काहीतरी पुण्यातलं या ब्लॉग वरची माझी हि बहुदा शेवटची पोस्ट. या पुढे पुण्यातलं लिहायला मी पुण्यात नसणार. काही लिहिलंच तर नाव गाव बदलून.

काही झाडांची मुळं खूप लौकर कुठलीही माती धरतात आणि फळू फुलू लागतात. काहींना मात्र सारखी माती बदलत राहावी लागते, त्याचं बस्तान बसे पर्यंत.


बघू आता, हे झाड कधी, आणि कुठली माती धरतय ते.