Tuesday, June 19, 2012

मैत्र


“राघव जेवण टेबलावर ठेवलंय. बाई येतील १२ ला तेव्हा वाढून देतील. काही लागलं तर फोन कर मला. गेम्स खेळत बसू नकोस दिवस भर. आधीच या accident मुळे बराच अभ्यास बुडलाय आपला. आणि बाथरूम ला जाताना cruches घेऊन जा,उगाच पराक्रम करू नकोस काही. मुग्धा आली अभ्यासाला तर भांडत बसू  नकोस तिच्याशी.”

“हो ,हो,हो आई.रोज काय आपले तेच तेच instructions? १२ वीत गेलोय ना आता,एवढं कळतं मला.”

“हो रे बाबा,काळजी वाटते एवढंच. चल निघते मी ऑफिस ला. राहशील ना नीट?”

“हो गं आई. जा तू. किल्ली घे आणि आठवणीने.”
                                    ११ वी ची परीक्षा संपली आणि दुसऱ्या दिवशी मित्राच्या Activa वरून भर गुडलक चौकात राघव पडला. डावा पाय दोन महिने प्लास्टर मध्ये. आत्ता कुठे १५ दिवस झाले होते आणि राघव एवढ्यातच जाम कंटाळला होता. आधीच engineering entrance ची तयारी, त्यात क्लासेस बुडल्याचं टेंशन. नाही म्हणायला मुग्धा रोज दुपारी यायची. पण तिलाही अभ्यासच सुचायचा नुसता.
                                    दुपारी जेवून राघव TV बघत बसला होता, तेवढयात बेल वाजली. कोण आहे विचारे पर्यंत मुग्धा latch उघडून आत आली होती.

‘धा,तुला किल्ली काय उगाच दिली आहे का आई ने? बेल का वाजवतेस कारण नसताना?’ राघव चा मूड आज उखडलेलाचं होता.

‘अरे म्हणलं एकदम धडकायचं कसं. Manners नको का काही?’

‘माझ्या घरी कधीपासून Manners लागू लागले तुला?’

‘बरं. नाही वाजवणार उद्यापासून. काय चाललंय? आणि TV?? राघव,अभ्यास कोण करणार?’

‘तू. आणि प्लीज एवढी ओवर होऊ देत.’

‘नाही!! फिजिक्स मध्ये मागे पडतोय आपण. कळतंय ना? अजून projectile सुरु पण केलं नाहीये.’

‘हो गं. माहितीये. तू तुझं बायो कर त्यापेक्षा. माझी match संपे पर्यंत.’

‘मी केलंय ते सकाळीच. सकाळपासून किती अभ्यास झालंय तुझा?’

‘धा,तू माझी teacher नाहीएस.’ राघव चं सगळं लक्ष TV कडे होतं.

‘काल ४ तास झाला होता फक्त.’

‘१२ वी साठी पुरेसा आहे तेवढा सध्या.’

‘मग JEE चा फॉर्म भरूच नकोस ना.’

‘पुरे झालं. तुला काय करायचंय? मी भरीन नाहीतर नाही. आल्यापासून बघतोय,साधं कसा आहेस,एवढ पण विचारलं नाहीएस तू मला. नुसतं Bossing करतेस. जीव नकोसा झालाय घरात बसून नुसता. रोज संध्याकाळी ग्राउंड वर मित्र football खेळताना दिसले की डोकच उठतं. वरून तुला साधी दोन वाक्य नीट बोलता येत नाही का गं?’

‘तू तुझ्याच चुकीमुळे पडला आहेस राघव,थोडं तर सहन करावंच लागणार ना.’

‘आता मात्र कमाल झाली! अगं पेशंट शी असं बोलतं का कोणी? एवढं लागलंय. दुखतंय केवढं.’ मुग्धा जोरजोरात हसू लागली. राघव चा त्रागा अजूनच वाढला.

‘हसतेस काय मूर्खासारखी? मी सांगून ठेवतोय,मी मारीन हं  धा तुला आता.’

‘हसू नको तर काय? पेशंट म्हणे. वागा आधी पेशंट सारखं. आणि १५ दिवस झालेत प्लास्टर लागून. अजून दीड महिना काढायचाय. किती कौतुक करणार त्याचं?’
राघव ने रागात रिमोट फेकून मारला. मुग्धा ने तो सहज चुकवला.

‘जा.तुझा तो कॉलेज crush, काय नाव त्याचं? हं अनिरुद्ध. तो पडला आणि पाय तुटला त्याचा की कळेल तुला.’

‘ते मी बघीन माझं..पुस्तक उघडा फिजिक्स चं आपलं.’

‘I HATE YOU मुग्धा. तू आत बस रूम मधे अभ्यासाला. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. I can study on my own.’ राघव रागात ओरडला.

‘जातेय. मलाही तुझ्याबरोबर अभ्यास करायचा नाहीए. अभ्यास कमी आणि timepass जास्त.’ मुग्धा आत जाता जाता बोलली.

‘आणि माझ्याशी बोलायची काही एक गरज नाहीये. गप अभ्यास कर नाहीतर घरी जा सरळ.’

‘काकूंनी सांगितलंय म्हणून येते मी इथे अभ्यासाला.तुझ्यासाठी नाही.’
-----------------------------
४ वाजले होते. दोघही एकमेकांशी नं बोलता अभ्यास करत बसली होती. राघव मनातल्या मनात रागाने धुमसत होता. बास. उद्यापासून मुग्धा ला सांगून टाकायचं,तू इथे यायची गरज नाहीये. मी बघीन माझं. आणि आता अभ्यास एके अभ्यास. कोणीही येऊन आपल्याला अभ्यासावरून बोलून जावं याला काय अर्थ आहे? हिचं काय कौतुक? काय समजते स्वतःला कोणास ठाऊक? १२ वी ला आता हिच्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीत जास्त मार्क्स पडलेच पाहिजेत. त्याने ठरवून टाकलं होतं. तेवढयात आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. नकळत त्याच्या इच्छेविरुद्ध राघव ओरडला.

‘धा,हजारदा सांगितलंय माझ्या गोष्टींना हात लावू नकोस म्हणून.’
तोपर्यंत मुग्धा हातात दोन तीन बॉक्सेस घेऊन बाहेर आली होती.

‘हे काय आहे आता?’

‘चेस,लुडो,सापशिडी,पत्ते. सांगा काय खेळणार आपण?’

‘मी तुझ्याशी बोलत नाहीए.’

‘ते दिसतंच आहे.’

‘मला काही खेळायचं नाहीये.’

‘ते ही वाटलंच होतं मला. लहानपणी सारखं हरणार परत. म्हणून घाबरून नाही म्हणतो आहेस तू.’

‘आवरा. किती खोट! तूच हरायचीसं आणि रडायचीसं.’

‘हो? मग एकदा पत्त्यांमध्ये हरल्यावर माझ्या बाबांकडे रडत रडत कोण गेलं होतं तक्रार घेऊन?’

‘तू पत्ता लपवलेला मुद्दाम. आणि मी परत एकदा सांगतोय मी रडत नव्हतो. सायनस मुळे डोळ्यात पाणी यायचं सारखं तेव्हा.’

‘बरं. राहिलं.’

‘राहिलं काय? आत्ता वाट पत्ते. लगेच कळेल कोण रडतं नेहमी ते.’ 
जणू त्याने हो म्हणायची वाट बघत असल्यासारखी ती लगेच पत्ते पिसायला लागली. राघव च्या चेहऱ्यावर नकळत स्मितहास्य फुलत होतं.

त्या भांडणातलं मैत्र फक्त त्या दोघांनाच दिसत होतं.

2 comments:

Anonymous said...

Essence of friendship is appropriately showcased, keeping the story line basic n simple. Still would have loved it if the individual emotions(Khara Mantla) would be highlighted.

indraneel said...

The thought was that you do no have to tell your true friend how do u feel about him/her. without saying that,the other person knows what he/she wants to say.. that's why i didn't highlight that thought.. :) Thanks :)